नगरपालिका पराभवानंतरही नवा संघर्ष; ओमराजे निंबाळकरांनी साल्हेर किल्ला पायी सर करत घेतली नवी ऊर्जा

पराभवानंतरही न खचता संघर्षाचा नवा निर्धार; खासदार ओमराजे निंबाळकरांनी साल्हेर किल्ला पायी सर करत घेतली नवी ऊर्जा

धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवरही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पराभव मनाला न लावता नव्या उमेदीने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, जिद्द आणि स्वराज्याच्या विचारांपासून प्रेरणा घेत त्यांनी सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांकडे नवी ऊर्जा शोधण्याचा मार्ग निवडला.हिंदवी परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित हिवाळी मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि ऐतिहासिक साल्हेर किल्ला पायी सर करण्याचा पराक्रम खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण केला.

सह्याद्रीच्या अवघड कडेकपाऱ्यांतून, दगडधोंड्यांच्या वाटांवरून चालताना शरीरासोबत मनाचीही कसोटी लागते. मात्र व्यायामाची विशेष आवड आणि कणखर शारीरिक तयारीच्या जोरावर त्यांनी हा कठीण ट्रेक लीलया पूर्ण केला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर गडावर उभे राहिल्यावर मन अभिमानाने भरून आले आणि स्वराज्याची जाणीव अधिक तीव्र झाली, अशी भावना ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.

शारीरिक थकवा जाणवत असला तरी मन इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांनी उंच भरारी घेत होते, असेही त्यांनी सांगितले.या ऐतिहासिक मोहिमेला विशेष अर्थ प्राप्त झाला, जेव्हा प्रसिद्ध शिवव्याख्याते व शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते खासदार ओमराजे निंबाळकर यांना “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून शिवविचार, सह्याद्री आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. हा पुरस्कार आपल्यावर अधिक जबाबदारी टाकणारा असून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अधिक दृढ करणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले.


उंचीबरोबरच शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासासाठी ओळखला जाणारा साल्हेर किल्ला सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर मानला जातो. अशा ऐतिहासिक स्थळावरून मिळालेली प्रेरणा आगामी काळातील सामाजिक व राजकीय वाटचालीस निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.